देशात कोरोनाचे हजार रुग्ण   

केरळमध्ये सर्वाधिक; महाराष्ट्र, दिल्लीतही संख्या वाढली

नवी दिल्ली : देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात २५७ वरुन एक हजार ९ पर्यत वाढली आहे. एकंदरीत रुग्णांची संख्या ७५२ ने वाढली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ३०५ जण आजारमुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. 
 
केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून  कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार कोरोना विषाणूचा उपप्रकार एनबी १. ८.१ आणि एलएफ ७ देशात सक्रिय झाला आहे. तामिळनाडूत एप्रिलमध्ये एनबी १.८.१ चा एक रुग्ण तर एलएफ ७  विषाणूचे चार रुग्ण मे महिन्यात सापडले होते. जागतिक आरोग्य संघटनेने विषाणूचे दोन उपप्रकार असल्याला दुजोरा दिला आहे. हाच विषाणू चीन आणि आशियात पसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोरोना विषाणूचे दोन उपप्रकार मूळच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत सौम्य आहेत. त्यामुळे निदानानंतर त्यावर मात करता येणे शक्य आहे. तसेच घरातच सहज उपचार करण्यायोग्य आहे. आता आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने पाहणी करण्यावर भर दिला आहे.

घाबरण्याचे कारण नाही

कोरोना विषाणूच्या दोन उपप्रकारामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. तज्ज्ञांनी सांगितले की, सर्दी, नाक चोंदणे, डोके दुखणे, स्नायूला पेटके, मळमळ आणि ताप आला तर नागरिकांनी तातडीने डॉक्टरांकडे जावे. विषाणूचा उपप्रकार तुलनेत सौम्य आहे. मात्र, रुग्णांनी हयगय न करता चाचणी करुन घ्यावी. आरटीपीसीआर चाचणी ९९ टक्के अचूक निदान करते. त्यामुळे तातडीने उपचार झाल्यास आजार आटोक्यात येतो.

राज्यांतील रुग्णांची संख्या

केरळ : ४३०
महाराष्ट्र : २०९
दिल्ली /एनसीआर : १०४
गुजरात : ८३
कर्नाटक (बंगळुरू) : ३०
पश्चिम बंगाल :११ 
तामिळनाडू : ४ 
एकूण संख्या : १ हजार ९
मृत्यू : ७ 
 

Related Articles